HealthLatestNewsUncategorizedगोंदियाविदर्भ

किटकजन्य आजार रोखण्यासाठी डिलार्वा व गप्पी मासे सोड मोहिम लोकसहभागातुन यशस्वी करा : जिल्हा हिवताप अधिकारी  डॉ. विनोद चव्हाण

गोंदिया : जिल्ह्यात मागील आठवड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने पावसाचे पाणी सर्वत्र साचलेले दिसत आहे.त्यामुळे डासोत्पती स्थानकांची वाढ होण्याची शक्यता बघता राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात किटकजन्य आजार जसे हिवताप,डेंग्यू, चिकनगुनिया,चंडीपुरा,जे.ई.व हत्तीरोग इत्यादी आजाराबाबत वाढते रुग्णांची शक्यता बघता आरोग्य विभागामार्फत दि. 2 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील डासोत्पती स्थानकामध्ये गप्पी मासे सोड मोहीम राबविण्यात आली.परंतू जिल्ह्यातील कायमस्वरुपी व तात्पुरते डासोत्पती स्थानकामधील डास अळी नष्ट करण्यासाठी गप्पी मासे सोड मोहीम निरंतन करणे गरजेचे आहे. तरी जिल्ह्यात दि.4 ते 9 ऑगस्ट या कालावधीत डीलार्वा व गप्पी मासे सोड मोहिम राबविण्यात येत असल्याने लोकसहभागातुन सदर मोहिम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी गोंदियावासियांना केले आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने पावसाचे पाणी सर्वत्र साचलेले दिसत आहे.त्यामुळे डासोत्पती स्थानकांची वाढ झाली आहे.गोंदिया जिल्हा हिवतापाबाबत संवेदनशील जिल्हा म्हणुन घोषित केलेला आहे.गोंदिया जिल्हा हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे.भात शेतीसाठी पाणीयुक्त चिखलची गरज भासते तसेच तलावांचा जिल्हा म्हणून वेगळी ओळख आहे.तसेच जंगलव्याप्त भाग, घनदाट झाडी व झुडपे यामुळे डास व डास अळीसाठी पोषक वातावरण असते.जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघत असतात.त्यामुळे हिवतापाचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणे गरजेचे बनलेले आहे. हिवताप रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.गावपातळीवर हिवतापाचा प्रादुर्भाव ही प्रमुख समस्या निर्माण झालेली आहे.ती गावातच सोडवावी जेणे करुन त्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढणार नाही.
जिल्ह्यात दि.4 ते 9 ऑगस्ट या कालावधीत गृहभेटी दरम्यान दैनंदिन सर्वेक्षणाच्या माध्यमातुन कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक,आरोग्य सेविका, आशा सेविका यांचे मार्फत ताप सदृष लक्षणे असलेल्या लोकांचे रक्त नमुने घेणे,तात्पुरत्या व रिकाम्या न करता येणार्या डासोत्पती स्थानात डीलार्वा व कायम स्वरुपी डासोत्पती स्थानात गप्पी मासे सोडण्यात येत आहे. कार्यक्षेत्रातील गावात कोरडा दिवस पाळणे,शाळेच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य शिक्षण देवुन जनजागृती करणे, आरोग्य भिंतीवर तसेच गावात किटकजन्य आजाराबाबत म्हणी लिहीणे व व्हेंट पाईपला जाळी बांधुन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  हिवताप आजार होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीनी गावपातळीवर वेळीच खबरदारी उपायोजना केल्यास हिवताप आजाराला झिरो करण्यास शक्य असल्याचे डॉ. चव्हाण यांनी या दिवसाबाबत आव्हान केलेले आहे.


…………………………………….
कीटकजन्य आजार नियंत्रणा करिता मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.घरातील पाणी साठ्यावर झाकण ठेवावे,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा,मच्छरदाणीचा वापर करावा,खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी,भंगार सामान व निकामी टायर यांची विल्हेवाट लावावी,कुलर,फ्रिजच्या ड्रीपपॅन मधील पाणी नियमितपणे स्वच्छ करावे. पाण्याचा हौद,टाक्या,रांजण इत्यादी दर आठवड्याला स्वच्छ करावे.नाल्या,गटारे वाहती करणे,साचलेल्या पाण्यात डबक्यात जळलेले ऑइल/ रॉकेल सोडणे, कुंडी व फुलदाणी मधील पाणी बदलवित जाणे, घराच्या आजुबाजुला असलेले टायर्स, बाटल्या, बादल्या,करवंटे,या मधील पाणी फेकणे,डासाला पळवुन लावणार्या साधनांचा वापर करणे, झोपताना पुर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे अशा विविध उपाययोजना अंमलात आणुन किटकजन्य आजार लोकसहभागातुन कमी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी या दिवसाबाबत केलेले आहे. मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी डासांपासून मानवांमध्ये संक्रमण आणि मानवांकडून डासांमध्ये संक्रमण यापैकी कोणताही एक घटक खूप कमी झाला तर त्या भागातून मलेरियाचे उच्चाटन होऊ शकेल त्यामुळेच हिवताप जोखीमग्रस्त भागात रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधांसोबतच डासांचे निर्मूलन किंवा चावण्यापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात.  डासांच्या उत्पत्तीची ठिकाणी नष्ट करून हिवताप आजारावर बरेच नियंत्रण मिळवता येते. साचलेला पाण्यात डासांची पैदास होते, अशा साचलेल्या पाण्याची भांडी झाकून ठेवावी, वाळवावी किंवा निचरा करावा किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर तेल टाकावे जेणेकरून डासांच्या अळ्या श्वास घेऊ शकत नाही.
……………………………………..
एक दिवस कोरडा डिवस पाळा
 साचलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तू नष्ट कराव्यात. अनेक घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात.यामध्येही मोठ्या प्रमाणात हिवताप व डेंग्यू पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून येतात. त्यामुळे पिंप व पाणी साठवण्याची इतर भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाण्याचे पिंप वा इतर भांडी पूर्णपणे उलटे करून ठेवावीत.त्यानंतर काही वेळाने ती कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावीत. पुसत असताना ती दाब देऊन पुसावीत. त्यामुळे पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील.
……………………
येथे होते डासांची उत्पत्ती : बाटलीचे झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकूलन यंत्रणा, रेफ्रिजरेटर, डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोपांच्या कुंड्यांखालील ताटल्या यांसारख्या विविध वस्तूंमध्ये साचलेल्या काही थेंब पाण्यातही उत्पन्न होणारे डास हे डेंग्यू व मलेरियाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. त्याचमुळे पाणी साचू शकेल, अशा वस्तू सातत्याने हटविणे व त्यात साचलेले पाणी नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.
आठवड्यातुन एकदा हे कराच : साचलेल्या पाण्यात डासांची मादी एकावेळी सुमारे १०० ते १५० अंडी घालते. या अंड्यांमधून डास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी लागतो.हे लक्षात घेता, दर आठवड्यात किमान एकदा तरी आपल्या सोसायटीच्या,घरांच्या व कार्यालयाच्या परिसराची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.या अंतर्गत आपल्या आजुबाजुचा परिसर व घरे, लिफ्टचे डक्ट, इमारतीची गच्ची इत्यादी विविध ठिकाणांची आठवड्यातून एकदा तपासणी करून तिथे पाणी साचलेले नसल्याची खात्री करून घ्यावी.
…………………………..
हिवताप व डेंग्यु जनजागृती साठी प्रतिबंधात्मक करावयाच्या महत्वाच्या बाबी
प्रत्येक घरामध्ये शोष खड्डा परसबाग यांची निर्मिती करणे.
घरामध्ये हवा व सूर्यप्रकाश खेळता राहील अशी व्यवस्था करणे.
शौचालयाचे सेप्टीक टैंक हे डासांचे उत्पत्ती स्थान असल्याने व्हॅन्ट पाईपला जाळी बसवणे.
आठबडयातुन एकदा कोरडा दिवस पाळणे.
घरा सभोवतालची गटारे वाहती करणे.
बायोगॅस मध्ये जळके तेल अथवा रॉकेल टाकणे.
किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करणे.
सार्वजनिक सांडपाणी, गटारी यांची योग्य विल्हेवाट लावणे.
डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे.
ग्रामपंचायत मार्फत् खड्डे बुजवणे.
गप्पी मासे मोठ्या प्रमाणात सोडणे.
आवश्यकता भासलेस धुर फवारणी करणे. स्वयंसेवी संस्था, आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच खाजेंगी दवाखाने यर्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घेणे-
घर, घराच्या परिसरात नारळाच्या कवट्या, टायरमध्ये पाणी साचू देऊ नका.
डासांना घरात येण्यास रोखण्यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा.
घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करा.
घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवा.
ताप येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा त्वरित सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करा.
अंगाबर ताप काढू नका.येता कण कण तापाची,करा तपासणी रक्ताची.
स्थलांतरीत,पत्ता सिजन मजुरांनी गावी आल्याबरोबर रक्ताची तपासणी अवश्य करावी.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *