गुदमा-प्रतापबाग रेल्वे जमीन संपादनाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश तीव्र! ७ सप्टेंबरला कटंगी नाक्यावर ‘रास्ता रोको’
कटंगी कलात १२ गावांतील बाधित भूधारकांची बैठक; ५ पट मोबदला आणि शासकीय नोकरी देण्याची मागणी
गोंदिया (३० ऑगस्ट): गुदमा ते प्रतापबाग दरम्यान प्रस्तावित नव्या रेल्वे लाईनच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या जमीन संपादन प्रक्रियेविरोधात बाधित शेतकरी व भूधारकांचा असंतोष अधिकच तीव्र झाला आहे. शनिवार, २९ ऑगस्ट रोजी कटंगी कला येथील मयूर लॉनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बाधित भूधारकांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आंदोलनाचा भडका उडवून देत येत्या सोमवार, ७ सप्टेंबर रोजी कटंगी नाका (बालाघाट रोड) येथे चक्काजाम ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला गोंदिया तालुक्यातील गुदमा, गोंदिया ग्रामीण, खमारी, डागोतोला, चुलोद, दतोरा, हलबीटोला, घिवारी, चांदनीटोला, लोधीटोला, कटंगी कला आणि नागरा यासह विविध गावांतील बाधित शेतकरी, घरे, प्लॉट व दुकानमालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाकडे मागितल्या चार प्रमुख मागण्या
बैठकीत बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मागण्यांचे पत्र तयार केले:
संपादित जमिनीचा मोबदला सध्याच्या बाजारमूल्यापेक्षा ५ पट अधिक देण्यात यावा.
प्रकल्पबाधित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी.
३० मीटरपर्यंतच्या अतिरिक्त जमिनीसाठीही योग्य नुकसानभरपाई मिळावी.
शेतात जाण्या-येण्यासाठी बाधित भागात हक्काचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा.
……………………………
७ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता बालाघाट रोडवर चक्काजाम!
बाधित शेतकऱ्यांनी यापूर्वीच गोंदियाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना (SDO) निवेदन सादर करून मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती केली होती. मात्र, प्रशासनाकडून ठोस पावले न उचलल्याने आंदोलनाची दिशा तीव्र करण्यात आली आहे. येत्या ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कटंगी नाका, बालाघाट रोड येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.
या बैठकीला अखिलेश सेठ, कार्तिक चौहान, सूरज बावनकर, सुप्रीत बैंस, राजू चन्नेकर, राजू बिसेन, राधाकृष्ण ठाकूर, चूटे गुरुजी, अय्यूब शेख, जितेंद्र लिल्हारे, गजेंद्र कवास यांच्यासह १२ गावांतील शेकडो बाधित शेतकरी व नागरिक उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार भूधारकांनी व्यक्त केला आहे.

