LatestNewsमहाराष्ट्रविदर्भ

लाखांदूरच्या सीमावर्ती जंगलात ४ वाघांचा मुक्त संचार!

जागतिक व्याघ्र दिनानिमित्त विशेष:
सुरक्षेसाठी ४० ट्रॅप कॅमेरे व वनविभागाची फौज तैनात; गडचिरोली-गोंदिया-भंडारा सीमा जोडल्याने वन्यजीवांचा वावर वाढला
लाखांदूर:
तालुक्यातील इंदोरा ते दहेगाव, मुर्झा आणि पारडीपर्यंतचा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला असून, या परिसरात सध्या तब्बल ४ वाघांचा वावर असल्याचे समोर आले आहे. वाघांची सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी वनविभाग पूर्णपणे सतर्क असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांनी दिली आहे.

तीन जिल्ह्यांची सीमा जोडल्याने वन्यजीवांचे कॉरिडॉर!
लाखांदूर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसराच्या सीमा अत्यंत मोक्याच्या मानल्या जातात. या परिसराच्या सीमा गडचिरोली जिल्ह्यातील वडसा जंगल परिसर आणि गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध नवेगाव बांध जंगल सीमेला लागून आहेत. तीन जिल्ह्यांच्या सीमा एकमेकांशी जोडलेल्या असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर मुक्त संचार पाहायला मिळतो. वाघांची शिकार रोखण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी लाखांदूर वनविभाग विशेष उपाययोजना राबवत आहे.
🔴 ४० ट्रॅप कॅमेरे आणि वनविभागाची चोख गस्त
वाघांच्या हालचालींवर अहोरात्र लक्ष ठेवण्यासाठी संपूर्ण जंगल परिसरात ४० ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली ३ क्षेत्र सहाय्यक, १३ वनरक्षक आणि ३ वनमजूर दिवसरात्र जंगलात गस्त घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. (विशेष म्हणजे, कोका अभयारण्यातही बिबट्यांसह रानगव्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे).
२०२२ मधील ‘सिटी-१’ ची ती भीषण दहशत!
लाखांदूर तालुक्याला मानव-वन्यजीव संघर्षाचा मोठा इतिहास आहे. २०२२ मध्ये ‘सिटी-१’ या नरभक्षक वाघाने तब्बल ४ जणांचा बळी घेतला होता:
२७ जानेवारी: दहेगाव जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेले प्रमोद चौधरी (वय ५४, रा. लाखांदूर) यांचा बळी.
४ एप्रिल: इंदोरा जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेलेले जयपाल कुंभरे (वय ४०) यांचा मृत्यू.
२१ सप्टेंबर: विनय खंगेन मंडल (वय ४५, रा. अरूणनगर) यांचा वाघाच्या हल्ल्यात अंत.
३० सप्टेंबर: तेजराम कार या शेतकऱ्याची शिकार. (या भीषण घटनांनंतर वनविभागाने ‘सिटी-१’ ला पिंजऱ्यात कैद केले होते).
तसेच, ३१ मार्च रोजी शेतात पिकांना सिंचन करण्यासाठी गेलेले खैरी पट येथील शेतकरी डाकराम गोपीचंद देशमुख (वय ४०) यांचाही वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या वाघालाही दोन दिवसांत जेरबंद करण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीवर वनविभागाने आतापासूनच खबरदारी म्हणून ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *