प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना आर्थिक मदतीचे आश्वासन
जि.प.अध्यक्ष भेंडारकर यांना निवेदन
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील खांबी व शिरेगाव या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सध्या पाणी मंडळामार्फत चालवल्या जात असून या योजनांच्या देखभाल व संचालनात मोठी आर्थिक तूट निर्माण झाल्याने मंडळांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांना निवेदन देण्यात आले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकूण चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यरत आहेत. त्यापैकी खांबी व शिरेगाव योजना चालविण्यासाठी कनेक्शन धारकांकडून मिळणारे उत्पन्न आणि प्रत्यक्षात येणारा खर्च यात मोठी तफावत असल्याने मंडळांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पाणी मंडळांनी १ एप्रिल २०२५ पासून योजना बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भंडारकर यांनी थेट हस्तक्षेप करून मंडळांना आश्वासन दिले होते की, त्यांच्या तोट्याची भरपाई जिल्हा परिषदेकडून करण्यात येईल. तथापि, आजअखेर मंडळांना अंदाजे दहा लाख रुपयांची भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे मंडळांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून, या निवेदनावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भंडारकर यांनी येणार्या चार दिवसांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेऊन दहा लाख रुपयांची मदत तातडीने करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी किशोर तरोणे (अध्यक्ष, सुजल एनजीओ), टीका रामजी कापगते (अध्यक्ष, शिरेगाव बांध प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळ), कालिदास पुसतोळे (सचिव, सुजल एनजीओ), नीलकंठ बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

