HealthLatestगोंदिया- भंडारा

एल-निनोचा विळखा! पाऊस न पडल्यास गोंदियावर जलसंकटाचे सावट

वैनगंगेत फक्त १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा
शेतकामे ठप्प; प्रशासनाचे ‘पाणी जपून वापरा’ असे आवाहन
गोंदिया :
हवामान खात्याने वर्तवलेला एल-निनोचा अंदाज आता जिल्ह्यात खरा ठरताना दिसत आहे. जून महिना अर्धा अधिक संपूनही पावसाने दडी मारल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. गोंदिया शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वैनगंगा नदीत आता केवळ १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’ (MJP) कडून मिळाली आहे. पुढील १५ दिवसांत जर समाधानकारक पाऊस झाला नाही, तर गोंदियाकरांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.


शेतीची कामे ठप्प, शासनाचे पिण्याच्या पाण्याला प्राधान्य
पाऊस लांबल्यामुळे एकीकडे जिल्ह्यातील शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. शेतकरी चिंतेत ग्रासला असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागातही पाणीटंचाईची समस्या हळूहळू उग्र रूप धारण करत आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने शेतीला पाणी न देता, उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागासाठी विशेष टंचाई निवारण कार्यक्रम राबवले जात असले, तरी गोंदिया शहराची संपूर्ण मदार वैनगंगा नदीवर असल्याने शहरापुढील चिंता वाढली आहे.
१५ दिवसांत पाऊस बरसला नाही, तर परिस्थिती गंभीर होणार! > वैनगंगा नदीने आतापर्यंत शहराला साथ दिली असून सध्या अखंडित पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु, येत्या पंधरवड्यात पाऊस न झाल्यास नदीचे पात्र कोरडे पडण्याची भीती आहे.
पुजारीटोला प्रकल्पाची धाव घ्यावी लागणार!
शहरासह लगतच्या ग्राम कुडवा, कटंगीला आणि आमगाव तालुक्यातील ग्राम डांगोरली येथील वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. एप्रिल महिन्यातच नदीची पातळी खालावल्याने मजीप्राने नदीपात्रात तात्पुरता बंधारा बांधून पाणी अडवले होते, ज्यामुळे मे महिन्यात संकट टळले. मात्र, आता ही मर्यादा संपत आली आहे. वैनगंगेने साथ सोडल्यास प्रशासनाला तातडीने ‘पुजारीटोला’ प्रकल्पातून पाणी मागवावे लागणार आहे, ज्यासाठी आतापासूनच हालचाली सुरू कराव्या लागतील.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *