गोंदिया जिल्ह्यात मानव-प्राणी संघर्ष पेटला !
मागील दोन दिवसात वाघासह हिंस्त्र प्राण्यांचा सतत हल्ला : जंगल शिवारात जाणे झाले धोकादायक
अर्जुनी मोरगाव/देवरी (गोंदिया) : जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागात सध्या मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असून मागील दोन दिवसांपासून वाघासह इतर हिंस्त्र प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. सलग होत असलेल्या हल्ल्यांमुळे जंगल शिवारात जाणे आता मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे झाले आहे. असे असतानाही वनविभागाच्या कथित दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत, परिणामी पाण्याचा शोध घेण्यासाठी आणि भक्ष्याच्या शिकारीसाठी हिंस्त्र प्राण्यांनी आता थेट मानवी वस्तीकडे धाव घेतली आहे.
सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम सुरू आहे. ग्रामीण भागातील हजारो मजूर आणि आदिवासी बांधव पहाटेच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जातात. मात्र, वाघांच्या वाढत्या वावरामुळे हे संकलन आता नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. मागील ४८ तासांत झालेल्या वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये हिंस्त्र प्राण्यांनी मजुरांना लक्ष्य केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. वनविभागाची गस्त केवळ कागदावरच मर्यादित असून, प्रत्यक्ष घटनास्थळी अधिकारी पोहोचण्यास उशीर करत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.
………………………………………………
थरारक; वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
काल एकाला जखमी केलं, आज वृद्ध महिलेचा घेतला बळी
अर्जुनी मोरगाव : जंगलाला लागून असलेल्या गावांमध्ये सध्या वाघाने अक्षरश: मृत्यूचे तांडव सुरू केले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (ता.१०) सकाळ दरम्यानची आहे. कौशल्या हरिदास रहाटे (६५) असे मृतक महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, गेल्या २४ तासांत वाघाने केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे.
तालुक्यातील वडेगाव बंध्या येथील कौशल्या हरिदास रहाटे (६५) या नेहमीप्रमाणे आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रविवारी सकाळी जंगलात तेंदूपत्ता वेचायला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची सूनही होती. दोघीही कामात मग्न असतानाच, झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक कौशल्याबाईंवर झडप घातली. काही कळायच्या आतच वाघाने त्यांचा गळा पकडला. सोबत असलेल्या सुनेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत वाघाने कौशल्याबाईंचा जीव घेतला होता. २४ तासांत वाघाने केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. शनिवारीच बोंडगाव परिसरात एका महिलेला वाघाने रक्तबंबाळ केले होते. ती घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका बळी गेला. परिसरात वाघासोबतच बिबट्यांचाही वावर वाढला असून पाळीव प्राणी आणि लहान मुलांवर हल्ले होत आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे.
………………………………….
अस्वल-रानडुक्कराच्या हल्ल्यात तीन महिला जखमी
देवरी : तालुक्यात सध्या रानटी जनावरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, मानवी वस्ती आणि शेतशिवारात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (ता.१०) सकाळी ८ वाजेच्या सुमारास तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या तीन महिलांवर वन्यप्राण्यांनी हल्ला केला. या घटनेत महिला जखमी झााल्या आहेत. यामुळे ओवारा, डोंगरगाव आणि देवाटोला परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
सविस्तर असे की, तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या ओवारा येथील वनमाला बोरकर (५५) आणि डोंगरगाव येथील भूमेश्वरी डोये (४०) यांच्यावर रानडुकराने हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तर दुसºया एका घटनेत देवाटोला येथील हिरणबाई वादीवे (५४) यांच्यावर अस्वलाने झडप घालून त्यांना जखमी केले. रानडुकराच्या हल्ल्यातील जखमी महिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अस्वलाच्या हल्ल्यातील जखमी महिलेवर साखरीटोला येथे प्राथमिक उपचार करून आमगाव येथे हलविण्यात आले आहे. रानटी जनावरांचे हल्ले वाढल्याने मजूर आणि ग्रामस्थांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. वनविभागाने या हिंस्त्र प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि जखमींना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

