Pitrupaksha 2025 : श्राद्धकर्मास प्रारंभ; पूर्वजांचे स्मरण
सामाजिक जाणिवेचीही जोपासना
गोंदिया : पितृपक्षात (Pitrupaksha) पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे. धार्मिक दृष्टिकोनातून, दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो, जो भाद्रपदमहिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असतो. पितरांचे स्मरण करण्याचा पंधरवडा म्हणजे पितृपक्ष (Pitrupaksha) रविवार दि. ७ सप्टेंबर पासून सुरू झाला आहे. हिंदू धर्मातील भाविक आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी भाद्रपद वद्य पंधरवड्यात रोज एका तिथीला तर्पण, पिंडदान, दान, जप आदी कर्मे करतात. यंदा श्राध्द ७ ते २१ सप्टेंबरदरम्यान आला आहे. यंदाचा पितृपक्ष पितृपक्षासाठी लागणाऱ्या भाज्या, वस्तू, तसेच किराणा वस्तूही महाग झाल्या आहेत. आवाहनाद्वारे पिंडदान, खीरदान तसेच ब्राह्मण भोजन आदी कर्मे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, अशी पारंपरिक श्रद्धा असल्याने भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात घरोघरी श्राद्धकर्म करण्याची प्रथा आहे. यावर्षी बुधवारी पौर्णिमेचे व प्रथम तिथीचे श्राद्धकर्म होणार आहे. यात चतुर्थीला भरणी, अविधवा नवमी, अमावास्येला सर्वपित्री श्राद्ध अशा विशेष दिवसांतही पितरांच्या नावाने तर्पण केले जाते. पितरांच्या नावाने पिंडदान करून त्यावर पाणी सोडून त्यांची आठवण केली जाते. या पंधरवड्यात पितर पृथ्वीवर येतात आणि पिंडाच्या प्रसादाने संतुष्ट होतात, तसेच आपल्या वारसांना आशीर्वाद देऊन जातात, असे मानले जाते. त्यानुसार घरोघरी आगामी १५ दिवस तिथीनुसार पितरांचे श्राद्धविधी केले जाणार आहेत. खीर व उडीद वडाहा पितरांचाप्रमुख नैवेद्य असून, काकस्पर्शाच्या माध्यमातून तो पितरांना दिला जातो.
…………………………..
(Pitrupaksha) पितृपंधरवडा शुभ
या १५ दिवसांत घरात शुभकार्य, तसेच कोणत्याही नव्या कार्याला सुरुवात केली जात नाही. या काळात फक्त पितरांचे स्मरण करावे, असे मानले जाते. मात्र, पंचांगकर्त्यांच्या मते हा पंधरवडा शुभच असून, आपली नैमित्तिक कामे केली तरी चालतात. या पंधरवड्यात तीन पिढ्यांचे म्हणजे वडील, आजोबा व पणजोबा यांचे श्राद्ध करतात. त्यानिमित्ताने त्यांच्या नावाने दानधर्म होतो. हा काळ पितरांच्या स्मरणाचा असल्याने या काळात शक्यतो लग्न, मुंज, वास्तुपूजन, पर्यटन आदी कामे करू नयेत. परंतु केस न कापणे, खरेदी न करणे यांसारख्या बाबींना खूप महत्त्व देण्याची गरज नाही, असेही पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
………………….
दानाची परंपरा
पितृ पक्षात स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे एखाद्या पवित्र ठिकाणी जाण्याची संधी न मिळाल्यास घरातच गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करावे. तसेच पितृपक्षाच्या (Pitrupaksha) काळात गरजूंना अन्न, पैसे किवा कपडे दान करा. पितृपक्षात पशु-पक्ष्यांची सेवा केल्यानेही विशेषलाभ होतो. त्यामुळे पितृपक्षाच्या काळात कावळे, गाय, श्वान इत्यादीना घरगुती अम्राचा काही भाग जरूर द्यावा, असे केल्याने पितर प्रसन्न होतात असे मानले जाते. अनेक जण श्राद्धविधीसह गरजू लोकांना मदत करतात. वृद्धाश्रम, अनाथाश्रमातील व्यक्तींना भोजन, कपडे आवश्यक वस्तूंचे दान वितरण करून सामाजिक दायित्व जोपासतात.
पूर्वजांच्या शांतीसाठी पवित्र काळ
हा १५ दिवसांचा हा काळ पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विशेष मानला जातो. या काळात श्राद्ध आणि पिंडदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे.

