LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

वैनगंगा कृषीधारा महोत्सवात तब्बल २२ लाखांची उलाढाल

आधुनिक तंत्रज्ञान व ‘नव तेजस्विनी’ उपक्रम ठरले आकर्षण
भंडारा :
रेल्वे ग्राउंड, खात रोड,भंडारा येथे दिनांक २० ते २४ मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘वैनगंगा कृषीधारा महोत्सव २०२६’ व ‘नव तेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनी’ ला नागरिक, शेतकरी व महिला बचत गटांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध स्टॉल्समधून मिळून सुमारे २२ लाख रुपयांची विक्री झाली असून स्थानिक उत्पादकांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) भंडारा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात शेती आणि ग्रामीण उद्योजकतेचा संगम पाहायला मिळाला.

महोत्सवात उभारण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये खते, नैसर्गिक उत्पादने, दर्जेदार तांदूळ, सेंद्रिय शेती साहित्य, तसेच माविमच्या बचत गटांनी तयार केलेल्या घरगुती वस्तू, हस्तकला उत्पादने आणि खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. विशेषतः महिला बचत गटांच्या स्टॉल्सना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवात खरेदीदार-विक्रेता संमेलन, यशस्वी शेतकर्‍यांचा सन्मान तसेच ‘माविम मित्र मंडळा’चा पुरुष सुधार सन्मान सोहळा यांसारखे उपक्रमही पार पडले. तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची माहिती व ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
वैनगंगा कृषीधारा महोत्सव हा शेतकरी, महिला बचत गट आणि ग्राहक यांच्यातील प्रभावी दुवा ठरला असून, २२ लाखांच्या विक्रीतून जिल्ह्यातील कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे.
…………………………
आधुनिक शेती तंत्रज्ञानाची झलक
या महोत्सवाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Aघ्) आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर याचे प्रात्यक्षिक होय. शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने उत्पादनवाढीसाठी नवे पर्याय उपलब्ध झाले. तसेच आधुनिक कृषी यंत्रसामुग्री व गुणवत्तापूर्ण निविष्ठांचे प्रदर्शनही लक्षवेधी ठरले.
…………………….
महिला सक्षमीकरणाला चालना
‘नव तेजस्विनी’ उपक्रमांतर्गत महिला बचत गटांना स्वतःची उत्पादने सादर व विक्री करण्याची संधी मिळाली. यामध्ये आहार तज्ञांचे मार्गदर्शन, पाककला स्पर्धा आणि विविध उपक्रमांमुळे महिलांच्या उद्योजकतेला नवे बळ मिळाले.
…………………….
तज्ञांचे मार्गदर्शन आणि परिसंवाद
महोत्सवादरम्यान नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, भाजीपाला लागवड, सूक्ष्म सिंचन तसेच पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसाय यांसारख्या विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यामुळे शेतकर्‍यांना पूरक व्यवसायांच्या संधींबाबत माहिती मिळाली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *