जांभळी शाळेच्या विद्यार्थ्यांना वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून मौल्यवान भेट
१०० पुस्तकांचा संच भेट
सडक अर्जुनी : गावागावात शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोड सवय जोपासली जावी, या उदात्त हेतूने जांभळी वनपरिक्षेत्र कार्यालयाने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, जांभळी येथील विद्यार्थ्यांना वाचनालयासाठी तब्बल १०० पुस्तकांचा संच भेट देऊन ‘ज्ञानदानाचे’ अमूल्य कार्य वनविभागाने केले आहे.सदर उपक्रम वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एन. नंदेश्वर यांच्या कल्पक संकल्पनेतून राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत ‘विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास साधावा’ यावर भर देण्यात आला आहे. यातंर्गत जिल्हा परिषद शाळा जांभळी येथील विद्यार्थ्यांना वाचनालयासाठी १०० पुस्तकांचा संच भेट स्वरूपात प्रदान करण्यात आला आहे.
विद्यार्थी जीवनात वाचनाला खुप महत्व आहे. वाचनापासून खरी प्रेरणा मिळत असते. यामुळे वाचनात पुस्तकांची भुमिकाही महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांची वाचनाप्रती आवड निर्माण करून छंद जोपासावा, असे मुख्याध्यापक किशोर डोंगरवार यांनी केले.
या पुस्तक संचात थोर महापुरुषांचे चरित्र, शास्त्रज्ञांच्या प्रेरणादायी कथा, बालसाहित्य, विज्ञानकथा, तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि नैतिक विकासाला चालना देणारे अनेक विषय समाविष्ट आहेत. पुस्तक संच वाटप कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी एम. एन. नंदेश्वर, मुख्याध्यापक किशोर डोंगरवार, डी. एन. सूर्यवंशी, एन. एम. मुंडकर, ए. जी. राऊत, एस. के. गराडे तसेच शाळेचे शिक्षक भुवनदास बागडे, धम्मदीप साखरे, श्यामा कुंडगिर, माया तांदळे, जितेंद्र कवरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत ‘दररोज १० मिनिटे वाचन’ करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

