अर्धनारेश्वरालयात तुळशी लग्नसोहळ्याची जय्यत तैयारी
अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांचा अभिनव उपक्रम
साखरीटोला : सालेकसातालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तुळशी-शालिग्राम’ लग्नसोहळ्याची जय्यत तैयारी झाली सुरु आहे. 2 नोव्हेंबर रोजीच्या रात्री 7.31वा. ‘तुळशी-शालिग्राम’ लग्न सोहळा पार पडणार असून श्री अर्धनारेश्वरालय नवयुवक गण सेवा मंदिर ट्रस्ट, युवा जागृती समिती व युवा शक्ती मंडळच्या नवयुवकांनी खऱ्याखुऱ्या लग्नसोहळ्यालाही लाजवेल अशी जय्यत तय्यारी सुरु केले आहे. अर्धनारेश्वरालयातील नवयुवकांनी दरवर्षी ‘तुळशी विवाह’ करण्याची आपली अनोखी परंपरा कायम ठेवली असून युवकांच्या हा अभिनव उपक्रम पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरला आहे. हा उपक्रम म्हणायला तुळशी विवाह असला तरी खऱ्याखुऱ्या विवाह सोहळ्यापेक्षा त्यात काहीही कमी नसते. पाहुणे मंडळींना रितसर निमंत्रण देण्यात येते. दोन ते अडीच हजार वऱ्हाड्यांची उपस्थिती मधे वैदिक मंत्रोपचार आणि मंगलाष्टके अशा थाटात तुळसी आणि शालिग्रामचा हा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाह केल्यानंतरच प्रत्यक्ष वर-वधूचे लग्न कार्य पार पाडण्याला सुरुवात केली जाते. ही परंपरा आपल्या देशात हजारो वर्षापासून सुरू असून शुभमंगल कार्यासाठी आजही लोक तुळशी विवाह पार पडण्याची वाट बघत असतात. प्रत्येक घरी तुळशी आणि शालीग्रामचे लग्न लावण्यात येते. परंतु ते लग्नकार्य घरची व शेजाऱ्यांकडील मंडळींपर्यंत मर्यादित असते. मात्र सालेकसा तालुक्यातील अर्धनारेश्वरालय (हलबीटोला) येथील १५ नवयुवकांनी मात्र दरवर्षी मोठया थाटामाटात तुळशी विवाह करण्याची अभिनव परंपरा सुरू केली असल्याने मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती असते. यंदा 2 नोव्हेंबर 2025च्या तुळशी विवाह कार्यक्रमाची संपूर्ण गावाला निमंत्रण देत आपआपल्या इष्ट मित्रांना तसेच अधिकारी, पदाधिकारी वर्ग आणि भाविकांना व विविध संघटनांना सुद्धा आमंत्रित केले आहे. या आमंत्रणाला मान देत विविध ठिकाणावरुन जवळपास दोन ते अडीच हजार पाहुणे मंडळी उपस्थित होणार असल्याचे सांगण्यात आले. येथील नवयुवक आपली संस्कृती व लग्न समारंभाचा वारसा जपत आहेत. प्रवेशद्वारावर पाहुण्याचे स्वागत करण्यात येणार आहे. तुळशी विवाह हिंदू वैदिक पद्धतीनुसार विधीवत मंत्रोपचार, पूजन व मंगलाष्टके इत्यादीनंतर तुळशी व शालीग्राम विवाह सोहळा पार पडणार असून येणाऱ्या पाहुण्यासाठी जेवणाची सुंदर व्यवस्था करण्यात येत असून यासाठी येथील नवयुवक परिश्रम घेत आहेत.

