फळबाग वृक्षलागवड उपक्रमाने पर्यावरण रक्षणास चालना : जिल्हा परिषद अध्यक्ष भेंडारकर
उपक्रमात तब्बल 2500 फळझाडांची लागवड
अर्जुनी मोर : तालुक्यातील बोरटोला इंजोरी ग्रामपंचायत अंतर्गत फळबाग वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात तब्बल 2500 फळझाडांची लागवड करण्यात आली. जिल्हा परिषद गोंदिया चे अध्यक्ष लायकराम भेंडारकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन, तसेच ग्रामीण भागात आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना लायकराम भेंडारकर म्हणाले, “आजच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तापमान वाढ, हवामानातील अनियमितता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. विशेषतः फळझाडांची लागवड केल्यास पर्यावरण संवर्धनासोबतच भविष्यात उत्पन्नाचा स्त्रोतही निर्माण होतो.”

आज आपण जे झाड लावणार आहोत, त्याचे फळ उद्या कोणीतरी चाखेल, त्याचा उपयोग कोणाच्यातरी उपजीविकेसाठी होईल. हीच खरी “आज लावा झाड, उद्या मिळवा फळ” ही संकल्पना आहे.
वृक्ष हा निसर्गाचा सर्वोत्तम मित्र आहे. पण फळझाडे लावण्यामागे केवळ हिरवळ वाढवण्याचा नव्हे, तर अन्नसुरक्षेचा, पोषणाचा आणि आर्थिक समृद्धीचा उद्देश देखील आहे. फळबाग वृक्षलागवड केल्याने आपण केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी अन्न आणि उत्पन्नाचे साधनही तयार करतो.
कार्यक्रमात ग्रामपंचायत स्तरावरून विविध पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी संदीप कापगते उपसभापती, पंचायत समिती, कुंदा लोगडे पंचायत समिती सदस्य, कुरुंदा वैध सरपंच, काशिनाथ कापसे उपसरपंच, गीताताई नारनवरे ग्रा. स. सदस्य व माजी सरपंच, दीपंकर उके ग्रामपंचायत सदस्य, संजीव बडोले शिक्षक, सम्राट विद्यालय, डाकराम मेंढे पो. पा., नंदकुमार रामटेके सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, आर. पी. शहारे ग्रामपंचायत अधिकारी, वैद्यजी, मोरेश्वर मेश्राम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, इंजोरी, विलास गुढेवार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, बोरटोला, कोमल वलथरे, सतीश शिवणकर अध्यक्ष, वनसमिती, युवनाथ मेश्राम, नितीन देशमुख, विपिन खंडाईत, सविता राखडे, छबुताई शेंडे, सचिन रोकडे, धर्मराज मानकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात बचत गटातील महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामपंचायत व स्थानिक वनसमितीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक ग्रामस्थांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागात पर्यावरण रक्षण आणि उत्पन्नवाढीचा दुहेरी लाभ मिळवून देणारा हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

