कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांच्या पोषण आहाराकडे विशेष लक्ष द्यावे-डॉ. दिपक सावंत
टास्क फोर्स कुपोषण निर्मुलन आढावा सभा
गोंदिया (Gondia) : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी बालकांचे पोषण आहार व मुलींचे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना राज्याचे टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक सावंत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज टास्क फोर्स कुपोषण निर्मूलन व संसर्गजन्य आजार नियंत्रणाबाबत आढावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, प्रभारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) किर्तीकुमार कटरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल डोंगरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचे प्रतिनिधी डॉ. विनायक रुखमोडे उपस्थित होते.
डॉ.सावंत म्हणाले, जिल्ह्यातील शासकीय अनुदानीत व विनाअनुदानीत आश्रमशाळेतील प्रत्येक मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी दर तीन महिन्यांनी झालीच पाहिजे. गाव पातळीवरील आशा सेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविका यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गरोदर व स्तनदा माता यांची गृहभेटी दरम्यान विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच अंगणवाडीतील बालकांचे वजन व उंची वाढविण्यासाठी मुलांच्या पोषण आहारावर विशेष भर देण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
डॉ. सावंत पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य, महिला व बाल कल्याण, आदिवासी विकास प्रकल्प, शिक्षण व पंचायत विभाग यांनी लोकसहभागातून काम करण्याची गरज आहे. अंगणवाडी सेविका यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सॅम व मॅम मुलांकडे विशेष लक्ष देऊन कुपोषित बालकांना उपचारासाठी जवळच्या पोषण आहार पुनर्वसन केंद्रात भरती करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. अंगणवाडीतील प्रत्येक बालकांचे किमान तीन वेळा वजन घेऊन त्यांची सॅम व मॅम श्रेणी ठरविण्यात यावी. बालकांना त्यांच्या आवडीचे पौष्टिक आहार देण्याकडे विशेष लक्ष द्यावे. माता व बाल मृत्यू कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे, त्यासाठी लोकांमध्ये प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती करण्यावर भर देण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक व सादरीकरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी केले.
आढावा बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. महेंद्र धनविजय, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी निलेश जाधव, बालरोग तज्ञ डॉ. लिना धांडे व डॉ. सचिन उईके, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. निकिता पोयाम, आयईसी विभागाचे प्रशांत खरात यांचेसह आरोग्य विभाग, केटीएस सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील अधिकारी उपस्थित होते.

