समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा : जि.प.अध्यक्ष भेंडारकर
इंजोरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
अर्जुनी मोरगाव : समाजातील सर्वच स्तरातील लोकांना सोबत घेऊन त्यांना सहकार्य व मदत करणे हेच आपले परम कर्तव्य असले पाहिजे. समाजसेवा व लोकसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
इंजोरी येथे आयोजित मोफत रोगनिदान शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष सिताताई रहांगडाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्र समन्वयक विरेंद्र उर्फ बाळाभाऊ अंजनकर यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून जि.प.चे बांधकाम सभापती लक्ष्मण भगत, माजी उपाध्यक्ष यशवंत गणवीर, सविताताई पुराम, जि.प.सदस्य निशाताई तोडासे, पं.स.सभापती आम्रपालीताई डोंगरवार, सभापती चित्रकलाताई डोंगरे, गटविकास अधिकारी पल्लवी वाडेकर, केवळराम पुस्तोडे, होमराज पुस्तोडे, पारधी आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी तालुक्यातील जनतेसाठी मोफत रोगनिदान शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. नेत्ररोग, स्त्रीरोग, हृदयरोग बालरोग, कान-नाक-घसा रोग अशा अनेक तज्ञ डॉक्टरांची चमू याप्रसंगी इंजोरी नगरीत दाखल झाली होती. या मोफत रोग निदान शिबिराचा हजाराच्या वर लोकांनी लाभ घेतला. तसेच पाचशेच्या वर लोकांची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच ५८ लोकांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठोबा रोकडे यांनी सादर केले. संचालन नमिता लंजे यांनी केले.

