गणेश उत्सव सामाजिक एक्याचे प्रतीक-उपविभागीय अधिकारी शहारे
पोलीस स्टेशन अर्जुनी येथे शांतता समितीची सभा संपन्न
अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपती बाप्पांच्या उत्सवाची तयारी सगळीकडे जोरात सुरू आहे.दहा दिवस चालणारा हा उत्सव सामाजिक बांधिलकी जोपासतो.तालुक्यातील 31 गावांमध्ये एक गाव एक गणपती हा आदर्श निर्माण झाला आहे. माणसा माणसाला जोडणारा हा उत्सव महाराष्ट्र शासनाने नुकताच राज्य उत्सव म्हणून घोषित केला.या उत्सवात धार्मिक, सामाजिक एकतेचे दर्शन होते.ही परंपरा अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाहायला मिळते. महाराष्ट्रातील गणेश उत्सव म्हणजे सामाजिक एकतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शहारे यांनी केले. ते अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशन येथे शांतता समितीचे मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे,ठाणेदार कमलेश सोनटक्के, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष रमेश झोडे, शांतता समितीचे प्रा. जलीलखां पठाण, ओप्रकाशसिंह पवार, सुरेंद्रकुमार ठवरे, राधेश्याम भेंडारकर उपस्थित होते.
यावेळी ठाणेदार सोनटक्के यांनी येणारे सण उत्सव सामाजिक सलोखा सांभाळीत साजरे करा.प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन कायद्याचे पालन करा. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरी करा. समाजोपयोगी देखावे तयार करून या उत्सवातून सामाजिक संदेश द्या.शासनाने उत्तम देखावे,भजन मंडळ यासाठी पुरस्कारांची घोषणा केली.या स्पर्धांमध्ये भाग घेऊन मंडळासह गावाचे नाव मोठे करा.सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र सरकारने धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंगे काढण्याच्या निर्देशांचे पालन करा. वर्गणी करिता धर्मदाय आयुक्तांची परवानगी घ्यावी.मिरवणुकीमध्ये डीजे चा वापर न करता पारंपारिक वाद्यांच्या वापर करा.पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करून समाजासह पर्यावरणाचे ऋण फेडण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन आनी आभार पीएसआय नितीन आगासे यांनी केले.यावेळी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, डीजे व्यावसायिक उपस्थित होते.*”डीजे”वर करडी नजर* सण उत्सवात लहान मोठ्यांना डीजेचा क्रेज आहे.मात्र डीजेचे दुष्परिणाम समोर येत आहेत.हृदयाची स्पंदने वाढवून मृत्यू होणे, कानाच्या पडद्यांना इजा होऊन बहिरेपणा येणे, वयोवृद्धांसह आजारी नागरिकांना त्रास होणे आणि लेझर लाईट मुळे अंधत्व येण्याच्या अनेक घटना घडत आहेत.डीजेचा वापर पूर्णतः बंद व्हावा अशी अनेकांची मागणी आहे. यामुळे डीजेवर ध्वनीमापक यंत्राची करडी नजर राहणार आहे.

