सामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख कामे करा : आमदार विनोद अग्रवाल
नविन प्रशासकीय इमारतीत महसूल दिन साजरा
गोंदिया : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची तसेच शासनाच्या विविध योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. महसूल विभागाकडून सर्वच नागरिकांच्या अपेक्षा असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख कामे करावी, असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
नविन प्रशासकीय इमारत गोंदिया येथे आज (ता.1) ‘महसूल दिन’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी प्रजित नायर हे होते. अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी के.के.कांबळे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अजय क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

आमदार श्री. अग्रवाल पुढे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची तसेच शासनाच्या विविध योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. त्यामुळे हा विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. राज्य शासन लोकाभिमूख योजना राबवून गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने काम करीत आहे. प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केल्यास निश्चितच प्रत्येकाच्या मनात आपुलकीची भावना निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचा महसूल विभागाशी दैनंदिन कामकाजासाठी संबंध येत असतो, त्यामुळे शासकीय कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. जमिनीशी संबंधित अनेक लोकं कामानिमीत्त महसूल विभागाकडे येत असतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या कामाला महत्व देवून आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून जबाबदारीने कामे पार पाडावीत. सर्वसामान्य नागरिकांना सुलभ आणि जलद सेवा देण्यासाठी अधिकाधिक डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येणार आहे. महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्याबरोबरच प्रशासनातील सर्व घटकांच्या सक्रीय सहभागावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उपविभागीय अधिकारी श्री. खंडाईत म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे, यासाठी प्रत्येक योजनांची जनजागगृती करणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य घटकापर्यंत पोहोचवणे हा शासनाचा प्रमुख उद्देश असून गोंदिया येथील दुर्लक्षीत घटक असलेल्या मांग-गारुडी समाजाच्या 227 लोकांना जात प्रमाणपत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून तहसिलदार समशेर पठाण म्हणाले, महसूल विभागाचा सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क येत असतो. समान्य जनतेच्या प्रश्नांचे/तक्रारींचे निराकरण करण्याचे काम महसूल विभाग करीत असतो. नैसर्गिक आपत्ती काळात समन्वय ठेवून सतर्क राहणे तसेच निवडणुकीची कामे सक्षमपणे पार पाडण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत ‘महसूल सप्ताह’ निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे अधिकारी/कर्मचारी सीमा पाटणे, हस्तरेखा बोरकर, राजेश मेनन, सुपचंद लिल्हारे, नितेश चव्हाण, घनश्याम सोनवाने, मिलिंद बुंदेले, निर्मला डोंगरे, विजेंद लांजेवार, शिवशंकर सोरले राहुल रहांगडाले यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत दि.8 ते 10 जून 2025 दरम्यान ग्रीन लॉन, गोंदिया येथे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे राजेश बोडखे, प्रफुलकुमार कोरे, कपिल हरडे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व लॅपटॉप देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले. उपस्थितांचे आभार अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.