उपचारात हलगर्जीपणा केल्याने तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी २१ तास रुग्णालयात ठेवला मृतदेह!
वरुड ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकारडॉक्टरांवर कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन
वरुड (अमरावती): राजूरा नाका परिसरातील रहिवासी लक्ष्मण भलावी (वय २८) या तरुणाचा सर्पदंश झाल्यानंतर वेळेवर व योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत नातेवाईकांनी वरुड ग्रामीण रुग्णालयात जोरदार ठिय्या आंदोलन केले. दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम राहत नातेवाईकांनी तब्बल २१ तास मृतदेह रुग्णालयातच ठेवून दिल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.अखेर प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या चौकशीच्या आश्वासनानंतर रविवारी (१३ सप्टेंबर) दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले आणि मृतदेह अंतिम संस्कारासाठी नेण्यात आला.डिस्चार्ज दिला अन् घरातच बिघडली प्रकृती!प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मण भलावी याला सर्पदंश झाल्याने १२ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, सकाळी ९ वाजताच प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगून त्याला सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली. घरी पोहोचल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्याला पुन्हा रुग्णालयात आणले गेले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर संतप्त नातेवाईकांनी शनिवारी सायंकाळी ७ वाजेपासून रुग्णालयात मृतदेह ठेवून आंदोलन सुरू केले.उलटी छातीत गेल्याने मृत्यूचा प्राथमिक अंदाज: डॉक्टरया घटनेबाबत स्पष्टीकरण देताना रुग्णालयाचे डॉक्टर अथर्व काले यांनी सांगितले की, “सर्पदंशाची लक्षणे लक्षात घेऊन रुग्णाला ६ तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतरच त्याला सुट्टी दिली होती. नंतर पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाला उलट्या झाल्या आणि ती उलटी छातीत (श्वासनलिकेत) गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.”अधिकारी व लोकप्रतिनिधींची मध्यस्थीअप्रिय घटना टाळण्यासाठी तहसीलदार रामदास शेळके, ठाणेदार अशोक जाधव, डॉ. परीक्षित रामपुरे (मोर्शी), डॉ. प्रमोद पोतदार, नगराध्यक्ष ईश्वर सलामे, शेंदूरजनाघाटच्या नगराध्यक्षा सुवर्णा वरखडे, नगरसेवक नितेश धुर्वे, प्रा. कमलनारायण उईके, सतीश धुमटकर, मनिषा उईके, मनोज उईके, किशोर सलामे, जयपाल कुमरे, विजय उईके आणि अनूप बेले यांनी घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांशी चर्चा केली व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.

