मोदी सरकारच्या १२ वर्षांत विकासाला नवी गती : आमदार डॉ. परिणय फुुके
‘मीडिया संवाद’मध्ये मान्यवरांचे प्रतिपादन
गोंदिया : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या १२ वर्षांत देशाने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. मोदीजींच्या या दूरगामी व्हिजनमुळेच आज जागतिक पातळीवर भारताचा मान वाढला असून, महाराष्ट्र आणि विशेषतः गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला एक नवी गती मिळाली आहे,” असे प्रतिपादन आमदार डॉ.परिणय फुुके यांनी केले.
मोदी सरकारने नुकतेच 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या संदर्भात राईस मिल असोसिएशन सभागृहात ‘मीडिया संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात माहिती देताना डॉ. फुके बोलत होते.
गोंदिया येथे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी एका विशेष ‘मीडिया संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून देशात आणि स्थानिक पातळीवर झालेल्या अभूतपूर्व बदलांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या संवादादरम्यान बोलताना सांगण्यात आले की, गोंदिया जिल्ह्यासाठी नक्षलवादाचे उच्चाटन ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब ठरली आहे. सुरक्षा यंत्रणांचे बळकटीकरण आणि योग्य धोरणांमुळे या भागात शांतता प्रस्थापित झाली असून, विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच आदिवासी अंचलातील दुर्गम भागांपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी पोहोचवून आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने केले जात आहे.
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या गरीब कल्याणकारी योजनांचा थेट लाभ जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला आहे. पीएम आवास योजना, उज्ज्वला योजना आणि आयुष्मान भारत यांसारख्या योजनांमुळे गरिबांचे जीवनमान उंचावले आहे. यासोबतच गोंदियातील रस्ते, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधांचा (Infrastructure) मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याने स्थानिक व्यापार आणि दळणवळणाला मोठी चालना मिळाली आहे.
“आजचा हा मीडिया संवाद केवळ शासकीय योजनांची माहिती देणारा नव्हता, तर गोंदिया जिल्हा ‘विकसित भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेत किती ताकदीने आपले योगदान देत आहे, याचे जिवंत उदाहरण आहे. या कार्यक्रमाला आमदार डॉ.परिणय फुके यांच्यासह जिल्ह्यातील आ. विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, भाजप जिल्हा अध्यक्ष सीताताई रहांगडाले, संघटक विरेंद्र अंजनकर, भाजयूमो जिल्हा अध्यक्ष रोहित अग्रवाल, श्रीमती रचना गहाने, माजी सभापती सविता पुराम, माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले, तिरोडा नगराध्यक्ष अशोक असाटी, गोंदिया न. प. उपाध्यक्ष संतोष पटले, अभय अग्रवाल, सुनील केलनका आदीसह भाजप पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, माध्यम प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांनीही या संवादात सक्रिय सहभाग घेत स्थानिक विकासाच्या विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले.

