योजनांच्या अंमलबजावणीने पाच गावे होणार डिजिटल
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान : १७ प्रकारच्या योजनांची होणार क्रियान्वित
गोरेगाव : धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’अंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील १०५ गावे तर गोरेगाव तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गोरेगाव तालुक्यातील ५ आदिवासी गावे डिजिटल होवून विकासाच्या मुख्य प्रवाहात जोडली जाणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने आदिवासी गावांच्या विकासासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील १०५ आदिवासी गावांचा समावेश आहे. यामध्ये गोरेगाव तालुक्यातील ५ गावे समाविष्ट करण्यात आली आहे. या गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करून आदिवासी समाजाचा कायापालट केला जाणार आहे, अशी माहिती २७ सप्टेंबर ला आयोजित गाव कृती आराखडा बैठकीत प्रशासकीय विभागातील अधिकार्यांनी दिली. गोरगाव तालुक्यात या अभियानाअंतर्गत ५ गावे डिजिटल होणार आहेत. यामध्ये हलबिटोला, आसलपानी, लेंडेझरी, मुरदोली, बोळूदा या गावांचा समावेश आहे. ‘धरती आबा’ योजनेंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये १७ प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे. पुढील ५ वर्षांत एकही आदिवासी बांधव बेघर राहणार नाही. त्यांना शिक्षण, आरोग्य, पोषण, रोजगार व रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, व परिपूर्ण सुविधा या आदिवासी गावात या योजने अंतर्गत असणार याची माहिती देण्यात आली.
हलबीटोला येथे कृती आराखडा सभा
ग्राम पंचायत तेढा अंतर्गत हलबिटोला येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पं.स.उपासभापती रामेश्वर महारवाडे होते. बैठकीत गट विकास अधिकारी गौतम, विस्तार अधिकारी बिसेन, कृषी विस्तार अधिकारी चुनचूनवार, आरोग्य विस्तार अधिकारी पटले, माजी जिल्हा परिषद सदस्य खु्मेंद्र मेंढे, पं.स.सदस्य शालिनीताई ताराम, तेढाचे सरपंचा भूमेश्वरी औरासे, उपसरपंच नरेश कोहळे, ग्राम पंचायत सर्व सदस्य, निंबा वनपरीक्षेत्राचे अवस्थी, डॉ.डहाके, माजी सरपंच सावळराम ताराम, प्रतीक शहारे व गावकरी उपस्थित होते. या सभेत गावाचा विकास आराखडा हा गावकरीच करणार असून ज्या सुविधाचा अभाव गावात आहे त्या सुविधा गावांत उपलब्ध होणार यामुळे गावाचा सम्पूर्ण विकास होणार आहे. गावामध्ये शिवार फेरी करून आराखडा तयार करण्यासाठी कामाचे विवरण तयार करण्यात आले.०००००००००००

