laxmi mukti yojana : घरातील लक्ष्मीला न्याय; सेवा पंधरवाड्यातून लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा थेट लाभ : अपर जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव
शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महसूल प्रशासन सज्ज
भंडारा : “लक्ष्मी मुक्ती योजना (laxmi mukti yojana ) ही महिलांना संपत्तीत हक्क देऊन त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याला सुरक्षित करणारी ठरणार आहे. पती व्यसनाधीन असल्यास मुला-बाळांचे संरक्षण आणि महिलांचे सक्षमीकरण या योजनेतून साध्य होईल. तसेच शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सोप्या पद्धतीने मिळेल,” असे मार्गदर्शन अपर जिल्हाधिकारी राजेंद्र जाधव यांनी सेवा पंधरवाड्याच्या शुभारंभ प्रसंगी केले. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचे निर्देश देत उद्दिष्ट ठरावीक कालावधीत पूर्ण करण्याचे आवाहन केले.
हा कार्यक्रम आज तहसील कार्यालय साकोली येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई, नायब तहसीलदार भूपेश पेंदाम, श्रीमती देशभ्रतार यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तहसीलदार निलेश कदम यांनी सांगितले की, सेवा पंधरवाडा निमित्त विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असून, 1000 लाभार्थ्यांना (laxmi mukti yojana ) लक्ष्मी मुक्ती योजनेचा थेट लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्येक सोमवारी जनता दरबाराचे आयोजन करून नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत दोन जनता दरबार घेण्यात आले असून पहिल्या जनता दरबारातील पाचही तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून दुसऱ्या जनता दरबारात प्राप्त 12 तक्रारींचे निराकरण प्रक्रियेत आहे. तसेच तालुक्यातील 462 पानदान रस्त्यांचा शोध घेऊन पुढील प्रक्रिया सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

