वृक्ष संवर्धनाचा पत्ता नाही;पर्यावरणाचे नावावर पैशाची उधळपट्टी
एक पेड माँ के नाम योजना फोटोपुरतीच
सडक अर्जुनी : तालुक्यात सन २०१६-१७ पासून महाराष्ट्र शासनाची वृक्ष लागवड मोहिम निष्क्रिय झाली आहे.याला कारण रोपटे लावण्यावर भर असतो.पण संवर्धनावर लक्ष न दिल्याने झाडे नष्ट होतात.शासन एकीकडे पृथ्वी हिरवीगार करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्फत मोकळ्या जागेवर रोपटे लावून वृक्षात रुपांतर करण्यासाठी व त्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. परंतू वृक्ष संवर्धनाचा पत्ता नाही.तालुक्यात अनेक लावलेले रोपवन खड्ड्यातच मुरल्याचे दिसते. वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल कायम ठेवण्यासाठी सरकारी व मोकळ्या जागेवर लाखो रोपे लावली जात असून वृक्ष लागवडी करीता प्रोत्साहन करीत असतात. दुसरीकडे गोंदिया वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग मार्फत मनरेगा योजना अंतर्गत ही कामे केली जात आहेत. ही योजना राबविण्यासाठी लागवड केलेली रोपे जोपासण्यासाठी तीन वर्षे पर्यंत हजारो मजूर काम करतात. पण मजुरांचे सांगण्यावरून असे कळते की,मजुरांना वर्षांत तीन महिने ४-५ दिवस कामावर ठेवून बाकी दिवस पाण्याअभावी रोपटे जमिनीत गाडले जातात.याकारणाने रोपांचे वृक्षात रुपांतर होत नाही. त्यामुळे ही योजना निष्क्रिय ठरली आहे. आज तालुक्यात अनेक ठिकाणी रोड लगत लावलेले रोपटे जमीनदोस्त झालेली आहेत. वास्तविक ज्या ठिकाणी जंगल नाही अशा ठिकाणी रोपे लावायला हवी.पण तसे न करता जंगलातील रोडाचे कडेला रोपटे लावून शासकीय योजनेचा पैसा लुबाडण्याचा प्रकार दिसतो. कारण जंगलातील रोडाचे कडेला पूर्वीचीच झाडे असल्याने रोडाची कडा ही घनदाट असते.तरी त्या ठिकाणी दोन बाय दोन चे खड्डे जेसीबीने खड्डे खोदून पूर्वीचे असलेले झाड खोदून खड्डा जातो.आणि नैसर्गिक असलेले झाड उपटून टाकले जाते.वृक्ष लागवड ही केवळ फोटो सेशन पूर्तीच मर्यादित झाली आहे.

पर्यावरणाचे नावाखाली नैसर्गिक वृक्षांची कत्तल
एकीकडे कमी वृक्ष लागवड व वृक्षांचे संरक्षण, संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असतांना रस्ते व विकासाचे नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे.आणि दुसरीकडे शेतीत असलेले वृक्ष कापण्याची मंजूरी देऊन ५-६ शेतकऱ्यांचे शेतातील झाडे कापून शासनाची दिशाभूल केली जाते.व वृक्ष कटाची केली जाते.त्या तुलनेत वृक्ष लागवड शून्य आहे.तत्कालीन युती शासनाचे कालावधीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे संकल्पनेतून वृक्ष लागवड मोहिम सुरू करण्यात आली होती.त्या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोट्यावधी वृक्ष लागवड करण्यात आली होती.पण त्या मोहिमेला गालबोट लागले असून ती मोहीम थंडावली आहे.पण आता मुख्यमंत्री यांनी “एक पेड मा के नाम”ही योजना सुरू केली.पण ही योजना केवळ फोटो सेशन पूर्तीच मर्यादित राहणार आहे.

